भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आजची आघाडीची कंपनी इन्फोसिसच्या जीवनातील एक नवा अध्याय के. व्ही. कामथ या नव्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आता सुरू होणार आहे. १९८१ साली सहा मध्यमवर्गीय व्यक्तींनी दहा बाय दहाच्या एका खोलीत फक्त दहा हजार रुपयांच्या प्रारंभिक भांडवलानिशी स्थापन केलेली ही कंपनी आज जगातील एक आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे. जगातील ३३ देशांमध्ये ६४ कार्यालये, ६३ विकासकेंद्रे, १ लाख ३० हजार ८२० कर्मचारी असा प्रचंड विस्तार असलेल्या ‘इन्फोसिस’ ची कार्यसंस्कृती आजही एक आदर्श कार्यसंस्कृती म्हणून जागतिक स्तरावर गौरविली जाते. कॉर्पोरेट क्षेत्रात येणार्या चढउतारांची झळ इन्फोसिसलाही निश्चितच सोसावी लागली आहे. परंतु त्या सर्वांतून पार होऊन एका नव्या क्षितिजाकडे झेप घेण्यास ही कंपनी आज सज्ज आहे हा भारतीयांसाठी एक अभिमानास्पद विषय आहे. नाना देशांतले, नाना सांस्कृतिक पार्श्वभूमीचे कर्मचारी एकत्र नांदत असतानाही एक समान, आदर्श कार्यसंस्कृती राबवणे या कंपनीला कसे शक्य होते, हा जगासाठी कुतूहलाचा विषय आहे. भारतातील ज्या काही मोजक्या कंपन्या आहेत, की ज्यांचे कर्मचारी काही झाले तरी ती कंपनी सोडून जायला तयार होत नाहीत, अशांमध्ये ‘इन्फोसिस’ चा वरचा क्रमांक लागतो. या कंपनीच्या कर्मचार्यांचे सरासरी वय आहे फक्त २६. तारुण्याचा जोश, उत्साह आणि काही तरी आयुष्यात करून दाखवण्याची ईर्षा यांची सांगड नोकरीशी घातली गेली, तर काय चमत्कार घडू शकतो याचे इन्फोसिस हे उत्तम उदाहरण आहे. ‘इन्फोसिस’च्या कार्यसंस्कृतीचे काय विशेष आहेत? आपल्या प्रत्येक कर्मचार्याच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक गरजांकडे कंपनी व्यवस्थापनाचे काटेकोर लक्ष असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचार्याला वाटते की संस्थेमध्ये आपण महत्त्वाचे आहोत. ही भावनाच या कर्मचार्यांना अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरित करते. अधिकारपदांची उतरंड तेथे कर्मचार्यांच्या वैयक्तिक प्रगतीमध्ये अडथळा ठरत नाही. कर्मचार्यांमध्ये कार्यक्षमतेची, गुणवत्तेची स्पर्धा तर आहेच. जो काम करणार नाही, तो आपसूक बाजूला पडतो. त्यामुळे अधिकाधिक चांगले काम करण्याची प्रेरणा व त्यासाठी लागणारे सर्वतोपरी पाठबळ मिळाले की कोणाला चांगले काम करावेसे वाटणार नाही? ‘इन्फोसिस’चा विशेष हा आहे. मध्यंतरी त्यांनी ‘कॅच देम यंग’ हा उपक्रम राबवला. उत्कृष्ट अभियांत्रिकी व बिझनेस स्कूलमधील उत्तमोत्तम गुणवत्ता आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केेले. त्याची गोड फळे आज दिसून येत आहेत. आपला प्रत्येक कर्मचारी हा ‘थॉट लीडर’ असावा. त्याने स्वतःहून कंपनीच्या भल्याचा विचार करावा व त्या दिशेने कार्यप्रवण व्हावे असा दृष्टिकोन नारायणमूर्ती यांनी सतत बाळगला. त्यांची एक आठवण त्यांच्या एका सहकार्याने सांगितली होती. कार्यालयाचे दार त्यांच्यासाठी उघडणार्या सुरक्षा रक्षकाचे जेवण झाले आहे की नाही हे स्वतः नारायणमूर्ती त्याला विचारीत असल्याचे या सहकार्याने पाहिले. ही जातिवंत माणुसकी, आपल्या कर्मचार्याबद्दलची आपुलकी त्या कर्मचार्यांना निष्ठेमध्ये परिवर्तित झाल्याखेरीज कशी राहील? या कंपनीचे मुख्यालय जरी भारतात असले, तरी त्याचा व्यवसाय हा निर्यातप्रधान आहे. त्यातही विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे इन्फोसिसचे ९८ टक्के विद्यमान ग्राहक हेच त्या कंपनीला पुन्हा पुन्हा नवे काम सोपवीत असतात. आपल्या ग्राहकाशी दीर्घकाळ प्रस्थापित केलेले चांगले संबंध हा या कंपनीच्या यशाचा एक महत्त्वाचा घटक आहे. ग्राहकाला उत्तम सेवा पुरवण्यासाठी इन्फोसिसने ‘ग्लोबल डिलीव्हरी मॉडेल’ चा पाया घातला. म्हणजे आपले कार्यक्षेत्र केंद्रवर्ती न ठेवता, जेथे जेथे उत्तम कुशल मनुष्यबळ उपलब्ध असेल, कमीत कमी आर्थिक धोके असतील, तेथे कार्यालये, प्रकल्प नेण्याचा पाया पाडला. अशा असंख्य गोष्टी आहेत की जेथे ‘इन्फोसिस’ चे वेगळेपण नजरेत भरते. नारायणमूर्तींच्या पायउतार होण्याने इन्फोसिस एका महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपलेली आहे. नवे प्रमुख श्री. कामथ आयसीआयसीआयप्रमाणे तिची यशाची चढती कमान, आदर्श कार्यसंस्कृती कायम राखू शकतील की नाही, हे येणारा काळ सांगणार आहे..
नमस्कार
माध्यमे जसजशी बदलतात, तशी प्राधान्येही बदलत जातात. ब्लॉगची जागा आज सोशल नेटवर्किंग साइटस् नी घेतलेली आहे. त्यामुळे रोज हा ब्लॉग अपडेट करण्याऐवजी थेट फेसबुकद्वारेच आपल्याशी संवाद साधणार आहे...
त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...
त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...


0 आपली प्रतिक्रिया:
Post a Comment