नमस्कार

माध्यमे जसजशी बदलतात, तशी प्राधान्येही बदलत जातात. ब्लॉगची जागा आज सोशल नेटवर्किंग साइटस् नी घेतलेली आहे. त्यामुळे रोज हा ब्लॉग अपडेट करण्याऐवजी थेट फेसबुकद्वारेच आपल्याशी संवाद साधणार आहे...



त्यामुळे संपर्काचे अधिक सशक्त माध्यम येईस्तोवर तूर्त फेसबुकवर भेटू...







Friday, May 27, 2011

खेळखंडोबा

राज्यातील बारावीच्या निकालासंदर्भात जो गोंधळ झाला, तो अक्षम्य आहे. उच्च माध्यमिक विद्यालयांमधून घेण्यात आलेली अंतर्गत परीक्षा आणि मंडळाद्वारे घेतली गेलेली अंतिम परीक्षा यांचे गुण २० ः ८० या प्रमाणात जुळवून अंतिम निकाल तयार करण्याची नवी पद्धत यावर्षी प्रथमच अमलात आणली गेली होती. या अंतर्गत परीक्षेचे गुण नोंदवतानाच मोठ्या गफलती झाल्या. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणसंख्येहून कमी गुण त्यांच्या गुणपत्रिकांवर नोंदवले गेले असल्याचे आढळून आले आणि त्यातून हे प्रकरण उजेडात आले आहे. आता केवळ संबंधित सॉफ्टवेअरवर खापर फोडून शालांत व उच्च शिक्षण मंडळाच्या अधिकार्यांळना या प्रकरणात नामानिराळे होता येणार नाही. सॉफ्टवेअर हे शेवटी माध्यम आहे. त्याच्या आधारे गुण नोंदविले गेल्यावर हाती जी अंतिम गुणपत्रिका येते, ती तपासण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, ते अधिकारी काय करीत होते? विद्यार्थ्यांच्या हाती या चुकीच्या गुणपत्रिका पडेपर्यंत मंडळाच्या अधिकार्यांरना अशी चूक झाली आहे याचा थांगपत्ताही नव्हता ही बाब अधिक गंभीर आहे. विद्यार्थ्यांचा मंडळावरचा विश्वालसच उडून जावा अशा प्रकारचा हा गाफीलपणा मुळात घडलाच कसा याची चौकशी व्हायला हवी. चुकीच्या निकालामुळे शेकडो विद्यार्थ्यांना निष्कारण मनस्ताप भोगावा लागला आहे. अनेक विद्यार्थी उत्तीर्ण असताना अनुत्तीर्ण ठरले. त्यांना ज्या मनःस्थितीतून जावे लागले, त्याची जबाबदारी आता कोणी घ्यायची? बारावीच्या निकालावर पुढील व्यावसायिक कारकीर्द अवलंबून असते. कोणत्या विद्याशाखेत प्रवेश घ्यायचा, अभियांत्रिकीकडे वळायचे की वैद्यकीय क्षेत्राकडे वळायचे याचा निर्णयही बारावीच्या गुणांच्या आधारेच घेतला जातो. आधीच बारावीला असलेला विद्यार्थी बारावी परीक्षेबरोबरच सीईटी, अखिल भारतीय प्रवेश परीक्षा अशा विविध परीक्षा द्याव्या लागत असल्याने गोंधळलेला असतो. तणावाखाली असतो. त्यात अशा प्रकारचा निकालात घोळ घातला गेल्याने त्या विद्यार्थ्यांवरी ताण आणखी वाढला असेल. एखाद्याने अपेक्षेहून कमी निकालामुळे आलेल्या वैफल्यातून आत्महत्येचा निर्णय घेतला असता, तर त्याचा हकनाक बळी गेला असता. सुदैवाने गुणपत्रिकांतील घोळ लगेच लक्षात आला व त्याबाबत आवाज उठल्याने मंडळाला तातडीने आपली चूक दुरुस्त करण्यासाठी धावपळ करावी लागली आहे. तातडीने जुन्या गुणपत्रिका परत घेऊन नव्या देण्याची कार्यवाही करण्यात येणार असली, तरी या सार्याम प्रकारातून मंडळाचे जे हसे झाले आहे, त्याचे काय? संबंधित अधिकार्यांरना कारवाईची तंबी देऊन शिक्षणमंत्री स्वतः हात वर करू पाहात आहेत, परंतु गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्रात सर्व स्तरांवर आज जे गोंधळाचे, संभ्रमाचे वातावरण आहे, त्याची जबाबदारी त्यांच्याही शिरावर येते. प्राथमिक स्तरावर माध्यमाचा घोळ, माध्यमिक स्तरावर आठवी अनुत्तीर्णांना उत्तीर्ण करण्याची घाई, उच्च माध्यमिक स्तरावर बारावीच्या निकालाचा घोळ असा हा जो सगळा सावळागोंधळ चालला आहे, त्यातून शिक्षण व्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण होत आहे हे त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. आठवी अनुत्तीर्ण असलेल्यांना राजकारणात जाता येत असेल, परंतु चांगली व्यावसायिक कारकीर्द घडवायची असेल, तर त्यासाठी चांगले शिक्षण हवे. शिक्षणाचा दर्जा उंचावणे तर दूरच, उलट साध्या साध्या प्रशासकीय प्रक्रियाही जर बेजबाबदारपणे हाताळल्या जात असतील, तर त्यातून सावळागोंधळ निर्माण होणार नाही तर दुसरे काय होईल? शैक्षणिक माध्यमासारख्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत मूलभूत अशा विषयावर राजकीय हिशेब नजरेसमोर ठेवून निर्णय घेतला जाणार आहे, आठवी अनुत्तीर्णांना यंदापासून उत्तीर्ण करण्याचा घिसाडघाईचा निर्णय घेतानाही राजकीय हिशेबच नजरेसमोर ठेवले गेले. शिक्षणाचा असा खेळखंडोबा करणार्यान राजकारण्यांना भले शिक्षणाचे महत्त्व उमगले नसेल, चांगल्या शैक्षणिक पायाची राजकारणात आवश्यकताही नसेल, परंतु या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर त्यासाठी दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता उंचावलीच पाहिजे. येथे ती उंचावणे तर दूरच राहिले, उलट या क्षेत्राची दिवसेंदिवस घसरणच चालली आहे.

0 आपली प्रतिक्रिया:


राष्ट्रपतींसमवेत गोव्यातील इतर दैनिकांच्या संपादकांसमवेत.

  © Blogger templates The Professional Template by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP